नवी दिल्ली: देशभरातील पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या ( PM Kisan Yojana ) लाभार्थी शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून १८ जुलै रोजी २० व्या हप्त्याचे २ हजार रुपये खात्यात जमा होतील अशी चर्चा होती, मात्र आज पैसे जमा न झाल्याने शेतकऱ्यांची प्रतीक्षा आणखी वाढली आहे. आता २० व्या हप्त्याची रक्कम कधी मिळणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
काय आहे पीएम किसान योजना?
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत केंद्र सरकार शेतकऱ्यांना वर्षाला ६ हजार रुपयांची आर्थिक मदत करते. ही रक्कम प्रत्येकी २ हजार रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा केली जाते. फेब्रुवारी २०१९ मध्ये ही योजना सुरू करण्यात आली होती आणि आतापर्यंत शेतकऱ्यांना १९ हप्त्यांचे पैसे मिळाले आहेत. १९ वा हप्ता २४ फेब्रुवारी २०२५ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत बिहारमधील एका कार्यक्रमातून वितरीत करण्यात आला होता. त्यापूर्वीचा १८ वा हप्ता महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यात एका कार्यक्रमाद्वारे देण्यात आला होता.
पीएम किसानचा २० वा हप्ता लांबणीवर
पीएम किसान सन्मान निधी योजनेचे हप्ते साधारणपणे चार महिन्यांच्या कालावधीनंतर दिले जातात. १९ व्या हप्त्याचे वितरण २४ फेब्रुवारी २०२५ रोजी झाले होते, त्यामुळे आता चार महिने पूर्ण झाले आहेत. यामुळेच शेतकरी २० व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. सध्या खरीप हंगामाचे दिवस असल्याने शेतकऱ्यांना या पैशांची नितांत गरज आहे.
पात्रतेसाठी काय करावे?
२० व्या हप्त्याचे २ हजार रुपये मिळवण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी काही गोष्टींची पूर्तता करणे आवश्यक आहे, जेणेकरून त्यांना रक्कम मिळण्यास कोणतीही अडचण येणार नाही.
ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया: शेतकऱ्यांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे.
आधार लिंक बँक खाते: बँक खाते आधार क्रमांकाशी जोडलेले असणे बंधनकारक आहे.
बँक खात्याची पडताळणी: बँक खात्याच्या माहितीची योग्य पडताळणी केलेली असावी.
जमिनीची नोंद: शेतकऱ्याच्या नावावर जमीन असणे आवश्यक आहे.
स्टेटस तपासणी: पीएम किसान सन्मान निधीच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन आपल्या ‘बेनिफिशिअरी स्टेटस’ची (Beneficiary Status) तपासणी करावी.
मोबाईल क्रमांक अपडेट: ओटीपी (OTP) आणि इतर महत्त्वाच्या नोटिफिकेशन्स (Notifications) मिळवण्यासाठी मोबाईल क्रमांक अपडेट केलेला असावा.
या सर्व गोष्टींची पूर्तता केल्यास शेतकऱ्यांना २० व्या हप्त्याची रक्कम मिळण्यास मदत होईल. सरकारकडून लवकरच या हप्त्याची ( PM Kisan Yojana ) तारीख जाहीर होण्याची शक्यता आहे.








